नेपाळमधील आंदोलन चिघळले : गोळीबारात 20 आंदोलकांचा मृत्यू – गृहमंत्र्यांचा राजीनामा ; सोशल मीडियावरील बंदी उठवली

नेपाळ वृत्तसेवा (प्रतिनिधी) : सोशल मीडिया साइट्सवरील सरकारने घातलेल्या बंदीचा भडका उडाल्यानंतर नेपाळात परिस्थिती बिकट बनली आहे. आतापर्यंत पोलिसांच्या कारवाईत 20 जणांचा मृत्यू ओढवला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान, गृहमंत्री रमेश लेखक यांनी परिस्थिती पाहता राजीनामा दिला आहे तर नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नेपाळी सैन्य तैनात करावे लागले असून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

काय घडले नेपाळमध्ये ?
शांततापूर्ण निषेधात काही अवांछित घटकांच्या घुसखोरीमुळे हिंसाचार झाला आणि सार्वजनिक मालमत्ता वाचवण्यासाठी सरकारला बळाचा वापर करावा लागला, असा दावाही त्यांनी केला. सरकारचे उद्दिष्ट सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालणे नाही तर त्यांचे नियमन करणे आहे. त्यांनी 15 दिवसांत अहवाल सादर करणारी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणाही केली.

सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली
या निदर्शनानंतर नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली. सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली आहे आणि संबंधित एजन्सींना प्लॅटफॉर्म पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी आंदोलकांना निदर्शने संपवण्याचे आवाहनही केले.

काठमांडूमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह हजारो तरुणांनी जेएनझेडच्या बॅनरखाली संसदेसमोर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. काही निदर्शक संसदेच्या आवारात घुसले तेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पाण्याच्या, अश्रूधुराचा आणि रबर गोळ्यांचा वापर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूमध्ये झालेल्या संघर्षात 17 जणांचा आणि सुनसरी जिल्ह्यात पोलिसांच्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला. हिंसक निदर्शने पोखरा, बुटवल, भरतपूर, इटहरी आणि दमक येथे पसरली. प्राणघातक संघर्षानंतर नेपाळ काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. त्यांनी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान ओली यांना हा राजीनामा सादर केला.