गुंडांचे राज्य चालवू देणार नाही ; बीड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई निश्चित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –

मुंबई – बीडच्या प्रकरणात कुणालाही सोडण्यात येणार नाही, आम्ही गुंडांचे राज्य चालवू देणार नाही. कुणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही व खंडणी मागता येणार नाही, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीवर लटकेपर्यंत पोलिस स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

वाल्मीक कराड सीआयडीला शरण
बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड मंगळवारी पुण्यात सीआयडीपुढे शरण आला. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी भाष्य करताना बीडच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याची ग्वाही दिली.

सीआयडीला तपासाचे पूर्ण अधिकार
ते म्हणाले, बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही. या प्रकरणात ज्याचा संबंध ज्या प्रकरणात आढळेल त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचे राज्य आम्ही चालवू देणार नाही. कुणालाही या प्रकरणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. त्या दृष्टिकोनातून तपास अतिशय गतीशिल करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे. या प्रकरणात कुणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही वा कुणालाही दबाव टाकू दिला जाणार नाही, आम्ही सीआयडीला ही केस दिली असून त्यांना पूर्ण स्वायत्ता दिली आहे.

आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवरून चर्चा झाली आहे. मी त्यांना काळजी न करण्याची ग्वाही दिली. यासंबंधी काय वाटेल ते झाले तरी सर्व दोषी शोधून ते फासावर लटकेपर्यंत पोलिस स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास मी त्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.