उत्कृष्ठ काम करून पोलिस दलाचे नाव उज्वल करा : भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे –

भुसावळ : पोलिसांनी काम करतांना मन लावून काम केल्यास त्याचा फायदा होतोच शिवाय पोलिसांचे काम दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण असे आहे. हे काम करताना आपण प्रामाणिकपणे काम केल्यास याची दखल घेतली जाते, याचेच हे प्रमाणपत्र आणि गौरव केला जात आहे, असेच काम प्रत्येक पोलिसांनी करून पोलिस ठाण्याचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी येथे केले. शहरातील डीवायएसपी कार्यालयात पोलिस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भुसावळ विभागातील पाच कर्मचार्‍यांचा गौरव
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांना दरमहा ‘पोलीस स्टेशन एम्प्लाई ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरवण्यात येते. जून महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या भुसावळ शहरच्या महिला कॉन्स्टेबल पूनम विलास राणे, बाजारपेठचे कॉन्स्टेबल अतुल शंकरराव पवार, भुसावळ तालुक्याचे एएसआय बाळकृष्ण मुकूंदा पाटील, नशिराबादचे हवालदार युनूस रसुल शेख व भुसावळ शहर वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल संजय सुभाष वानखेडे यांचा पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांनी सन्मान केला. राणे यांनी ई समन्स वॉरंट नोंदणीबाबत उल्लेखनीय कामगिरी केली तर पवार यांनी क्राईम अभिलेख चांगल्या प्रकारे अद्यावत ठेवले. पाटील यांनी शंभर टक्के समन्स व वॉरंट बजावणी केली तर युनूस शेख यांनी चोरीस गेलेले गुन्हे उघडकीस आणून सात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या व संजय वानखेडे यांनी भुसावळ शहर वाहतूक शाखेत 221 केसेस करीत उत्कृष्ट कामगिरी केली.

यांची होती उपस्थिती
कर्मचार्‍यांच्या गौरव प्रसंगी भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन, शहरचे निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड, नशिराबादचे एपीआय रामेश्वर मोताळे, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.