विहिरीत पडलेल्या मांजराला बाहेर काढणाऱ्या तरुणास वाचवतांना पाच जणांचा गाळात गुदमरून मृत्यू –

नेवासा : विहिरीतील गाळात मांजर काढण्यासाठी उतरलेल्या तरुणाला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या एकाच कुटूंबातील चौघांसह अन्य एकाचा विहिरीतील गाळात रुतल्याने गुदमरून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नेवासे तालुक्यातील वाकडी येथे घडली.

यांचा ओढवला मृत्यू
या घटनेत विशाल ऊर्फ बबलू अनिल काळे (23), अनिल बापूराव काळे (58), बाबासाहेब पवार (35), संदीप माणिक काळे (36) माणिकराव गोविंदराव काळे (65) अशी मृतांची नावे आहेत.

अशी आहे नेमकी घटना
वाकडी शिवारातील अनिल बापूराव काळे यांच्या शेतावर असलेल्या जुनाट विहिरीत जनावरांचे मलमूत्र साठवले आहे. या विहिरीत पडलेले मांजर काढायला विशाल उर्फ बबलू अनिल काळे (23) गेला. हे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल बापूराव काळे (58) विहिरीत उत्तरले, पण तेही वर आलेच नाही. हे पाहून शेजारच्याच शेतातील बाबासाहेब पवार (35) हा त्यांना काढायला खाली गेला तो सुद्धा आतमध्येच गेला. दरम्यान, अनिलचा चुलत भाऊ संदीप माणिक काळे हे रस्त्याने जात होते त्यांना आवाज दिल्यानंतर ते देखील विहिरीत उतरले. बराच वेळ तेही – वर आलेच नाहीत हे पाहून त्यांचे वडील माणिकराव गोविंदराव काळे (65) विहिरीत उतरले आणि तेही वेशुद्ध होऊन गाळातच रुतले.

दरम्यान, अजय माणिक काळे (वय 36) हा कमरेला दोर लावून विहिरीत उतरला त्याला दम लागल्याने त्याने आवाज देताच लोकांनी त्याला चर काढले. त्याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर, श्रीरामपूर व छत्रपती संभाजीनगर येथून मदत कार्यासाठी टीम बोलावण्यात आल्या. विहिरीत गाळात सर्व जण उतरल्याने विषारी वायूमुळे ते बेशुद्ध होवून गाळात रूतल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू ओढवला.