भुसावळ (प्रतिनिधी )-
युरिया खताचा मोठ्या प्रमाणात साठा असतानाही भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना तालुका संघटक प्रा. धिरज पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी साठेबाजारी करू नका असे म्हणणाऱ्या तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहणे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला व शेतकऱ्यांना गरजे प्रमाणे खत पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कृषिमंत्र्यांचा आधीच इशारा:
राज्यभरातील कृषि निविष्ठा दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे तरी सुद्धा भुसावळ तालुक्यातील काही दुकानात असाच प्रकार घडला. शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या कडे सुद्धा तक्रार केली आहे.
अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कारवाई करावी:
दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर माहिती देणे बंधनकारक असताना सुदधा काही दुकानात तो कोरा असल्याने दुकानदार, तालुका कृषी अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांचे ताळमेळ नाही असे निदर्शनास आले आहे. कारण साधारण २७० टन साठा शिल्लक असताना शेतकऱ्यांना दिला जात नाहीय. खतांचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देतानाच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याने कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना कळविले आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.



