भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात लॉकडाऊनच्या काळात बांधकामे सुरू असल्याचे उघड झाल्याने पालिकेच्या पथकाने तिघांकडून ४५ हजारांचा दंड वसूल केला. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता पंकज पन्हाळे यांच्या पथकाने कारवाई केली. जामनेररोडवरील बांधकामावर कारवाई करून बांधकाम थांबविण्यात आले. या प्रकरणी घरमालक गणेश कोळी यांना १० हजार रुपये दंड करण्यात आला तर तापी नगरात रेल्वे कर्मचारी उत्तम सिंग यांच्या घराचे बांधकाम सुरू होते, त्यावरही कारवाई करून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. श्री गजानन महाराज मंदिराजवळील मनिषा तायडे यांच्या मालकीच्या जागेवरील बांधकाम थांबवून १५ हजार रुपयांचा दंड पथकाने वसूल केला.
मास्क न बांधणार्यांना उठाबश्याची शिक्षा ;
शहरात पालिकेच्या पाचही पथकांकडून मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणार्यांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. मोटारसायलकस्वार तरुणांनी मास्क लावलेला नसल्यास त्यांना थांबवून शर्ट काढून तोंड बांधण्यासह उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जात आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.



