भुसावळ – एका तृतीयपंथींने मृत्यूसमयी दिलेल्या कथित शापाच्या अफवा भुसावळ आणि जामनेर तालुक्यात पसरल्यानंतर महिलांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्मशान भूमीसह घराच्या परिसरातील निंबाच्या झाडाखाली दिवे लावलायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही तालुक्यात तृतीयपंथीने दिलेल्या शापाची कहाणी वेगवेगळी आहे. निव्वळ एका अफवेमुळे मोठ्या प्रमाणात महिला आज अंधश्रद्धेला बळी पडल्याचे चित्र होते.
रावेरच्या दंगलीत एका तृतीयपंथी जखमी झाल्यानंतर त्याने मृत्यूसमयी शाप दिला की, तुम्ही मला वाचवू शकणार नाही तर तुमच्या जातीतील मुले मरणार. पण शापातून मुक्त व्हायचे असेल तर मुलगा असलेल्या आईने स्मशानात किंवा निंबाच्या झाडाखाली दिवा लावण्याची कहाणी भुसावळात पसरली होती. तर जामनेर, धरणगाव, एरंडोल तालुक्यात देखील अशीच कहाणी होती, फक्त या ठिकाणी कुठल्याही विशिष्ठ जातीला नव्हे, तर हा शाप सरसगट सर्वांसाठी होता. तर तृतीयपंथीची हत्येचे ठिकाण नेमके सांगितलेले नव्हते. या अफवेमुळे दोन्ही तालुक्यातील बहुतांश महिलांनी स्मशानभूमीसह घरा जवळील भीती पोटी लिंबाच्या झाडाखाली दिवे लावले. दरम्यान, आज सकाळपासून देखील अशा पद्धतीचे फोन जिल्हा भरात सुरु होते.
मुक्ताईनगर –
संपूर्ण जगात मृत्यूचे थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू (कोविड19) या संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी देश व राज्य पातळीवर जनता कर्फ्यु , संचार बंदी या वेगवेगळ्या उपाययोजनांनी नागरिकांना बचावाच्या सूचना सरकार देत आहे .व कोणत्याही अफवेला बळी पडू नका असे आवाहन करीत आहेत .मात्र काल रात्रीचे 12 वाजेपासून मुक्ताईनगरातील मोबाईल फोन खणखणू लागले असून फोनवर आलेल्या अफवेतील सूचनेप्रमाणे एका किन्नराचा मारहाणीत कथित मृत्यू झाल्याने त्याने दिलेल्या शापानुसार ज्यांना एक किंवा दोन मुले आहेत त्यांनी अंगणात, निंबाच्या झाडाखाली कणकेचा किंवा पणतीचा दिवा लावावा अन्यथा त्या मुलांवर संकट येईल चक्क अशी धमकीच त्या फोन कॉल वरून आलेल्या अफवेत आहे .यानुसार ही अफवा दि 23 मार्च रोजी सोमवारी संपूर्ण शहरात वाऱ्या सारखी पसरल्याने पूर्ण शहरात अनेक घरांसमोर दिवे लागलेले दिसून येत आहे . दिवा लावल्याने काही नुकसान नाही त्यामुळे ही खोटी जरी अफवा असली तरी दिवा एक काय आणि दोन काय लावले तर काय नुकसान होईल असे म्हणत अनेक सुज्ञ नागरिकांच्या घरासमोर व इमारतीवर देखील दिवे लागलेले दिसून येत आहे . अनेक महिला व कुटुंबे या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या दिसून येत आहे .
किन्नर मृत्यू , शाप व दिवा
किन्नराचा खरेच मृत्यू झालाय का ? या प्रश्नाचा मागोवा घेतला असता एक दिवसात काय तर तब्बल एका महिन्याच्या कालावधीत देखील मुक्ताईनगर च काय ? अख्ख्या जळगांव जिल्हा व शेजारील मध्यप्रदेशात देखील अशी किन्नराच्या मृत्यू ची घटना कोठेही घडलेली नसल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले .तर कोरोना संदर्भात प्रशासन खुप काळजी घेत असतांना अशा अफवा उठवणे प्रशासकीय कामकाजाला अडचणीचे ठरू शकते त्यामुळे नागरिकांनी अशी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे जाणकारांचे म्हणणे आहे .
तीन वर्षांपूर्वी अशीच मानमोडी ची अफवा होती त्याच धर्तीवर आता अफवांचे पेव फुटत आहे .
अशीच मानमोडी ची अफवा तीन वर्षांपूर्वी मुक्ताईनगर शहरात वाऱ्यासारखी पसरली होती .त्यावेळी चक्क मध्यरात्रीपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत लोक झोपलेच नव्हते कारण अफवेनुसार जो ही झोपेल त्याची मान मुडेल व पुष्टी म्हणून अनेकांच्या माना मुडल्या व ते ठार झाले अशी खोटी अफवा आली होती .लोकांत या अफवेने तेव्हा भयंकर दहशत होती मात्र दुसऱ्या दिवशी ही निव्वळ अफवाच होती हे सिद्ध झाले होते . त्यामुळे अशा अचानक आलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये ,कारण कोरोना ही आंतराष्ट्रीय आपत्ती आपल्या देशावर काळाच्या रूपाने घोंगावत असून अशा अफवांना बळी पडू नये .



