भुसावळ (प्रतिनिधी )-
हतनूर धरण जलाशयाला ‘रामसार’ आणि ‘मिश्र वारसा’ स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई सुनील लिमये यांच्याकडे चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे करण्यात आली आहे. यावल अभयारण्यात झालेल्या गोळीबार आणि अतिक्रमण प्रकरणी लिमये हे पालच्या पाहणी दौर्यावर आल्यानंतर त्यांच्याशी चातक संस्थेच्या पदाधिकार्यांनी चर्चा केली. गोळीबार आणि अतिक्रमण याविषयी चातकने सविस्तर अहवाल शासनाला पाठवला होता व त्या अनुषंगाने लिमये, मुख्यवन संरक्षक धुळे वनवृत्त अमित कळसकर, नाशिक वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक डी.आर.पाटील (मुंबई) यांच्याशी चातक संस्थेच्या सदस्यांनी सविस्तर चर्चा केली तसेच हतनूर धरण जलाशयाला रामसार आणि मिश्र वारसा स्थळाचा दर्जा देण्यात यावा याचा प्रस्ताव देण्यात आला. यावेळी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, कार्यकारीणी सदस्य सत्यपालसिंग राजपूत, समीर नेवे, अनिल नारखेडे, नरेंद्र नारखेडे, सौरभ महाजन, मयूर नारखेडे, मिलिंद विसपुते आदी उपस्थित होते.



