भुसावळ (प्रतिनिधी ) – अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात तयारीला वेग आला आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते सजावटीपासून विविध सामाजिक उपक्रमांची तयारी करत असतानाच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासन सुद्धा ऍक्टिव्ह झाले आहे गणेशोत्सवाच्या काळात शेवटचे 3 ते 4 दिवस शहरातील सुमारे 50 उपद्रवींविरूध्द शहर बंदी राहणार आहे, त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू करण्यात असल्याची माहिती भुसावळचे नूतन पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी दिली.
गणेश विसर्जनाच्या काळात काही उपद्रवी घटकांकडून गोंधळ, भांडणे अथवा गटबाजी करीत वाद घालण्याचे प्रकार होऊ नये यासाठी शहर पोलीस ठाणे व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शहरबंदीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. या प्रस्तावांनुसार विसर्जनाच्या शेवटच्या तीन दिवसांत निवडक उपद्रवींना शहरात प्रवेश बंदी राहणार आहे. सुमारे 50 जणांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे
पोलिसांकडून तयार केलेले प्रस्ताव उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) जितेंद्र पाटील यांच्याकडे पाठवले जाणार असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. या कारवाईमुळे शहरातील वातावरण शांत राहील आणि भाविकांना गणेशोत्सव आनंदात साजरा करता येईल,असा पोलिसांचा विश्वास आहे.

डीवायएसपी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ हे प्रस्ताव तयार करण्याचे काम पाहत आहेत. गेल्या काही वर्षांत विसर्जनावेळी झालेल्या किरकोळ घटनांचा आढावा घेऊन ही योजना आखण्यात आली आहे. गणेशोत्सव हा उत्साह, श्रद्धा आणि ऐक्याचा सण असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी केले आहे.


