नंदुरबार,

नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी ६ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत आदेश जारी केले आहेत. आगामी शिवजयंती उत्सव, दहावी- बारावीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी जातीय दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता या उत्सव काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवजयंती उत्सव येत्या १९ फेब्रुवारीला साजरा होणार आहे. या कालावधीत विविध संघटनांच्या मिरवणुका, कार्यक्रमांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हि परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सदरचे आदेश काढले आहेत.
या शिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहेत. यामुळे परीक्षा केंद्रांवर नातेवाईकांची गर्दी आणि कॉपीच्या प्रयत्नांमुळे गोंधळ होऊ शकतो. हि सर्व परिस्थिती पाहता आदेश काढले असून या कालावधीत शस्त्रबंदी असून तलवार, भाला, लाठ्या- काठ्या किंवा इतर शस्त्र बाळगता येणार नाहीत. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई असल्याने मिरवणुका, सभा देखील घेता येणार नाहीत.
नंदुरबार जिल्ह्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशानुसार ६ ते २० फेब्रुवारी दरम्यान संचारबंदी व शस्त्रबंदी राहणार आहे. या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.


