जळगाव,

गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. तर अजूनही अनेक भागात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक तलावांच्या व धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. अशातच आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असल्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
रायगड आणि सातारा भागात पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यासोबत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे याठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला असून नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.


