वरणगाव नगरपरिषद वाऱ्यावर; मुख्याधिकारी कायमस्वरूपी नियुक्ती द्या ;नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; पाणी समस्या सोडवा – शिवसेनेची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

वरणगाव – शहरात नागरिकांना 15 ते 20 दिवसाने पिण्याचे पाणी मिळत आहे. नवीन 25 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. घंटा गाडी नियमित वॉर्डातील येत नाही, मुख्याधिकारी कायमस्वरूपी नियुक्त करा, अशा विविध समस्यां संदर्भात चर्चा करून शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना शनिवार दि. १५ रोजी पाळधी येथे निवेदन देण्यात आले. तेव्हाच तात्काळ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलून वरणगावच्या समस्या तात्काळ सोडवून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरणगाव तालुका भुसावळ येथील नवीन 25 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. वरणगाव शहरात 15 ते 20 दिवसांनी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. हातनुर धरणामध्ये पाणीसाठा असतानाही वरणगावला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी मिळते. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास नागरिकांना सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा होईल. या संदर्भात पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काम त्वरित करण्याचे आदेश आपण द्यावे. तसेच मुख्याधिकारी दिवसापासून सुट्टीवर गेलेले आहे. वरणगाव शहरात पिण्याच्या पाण्याचे तसेच स्वच्छतेचे तीन तेरा झाले आले. कारण याकडे कोणीही लक्ष द्यायला प्रशासन तयार नाही, घंटागाड्या नियमित वार्डात फिरत नसून कचरा रस्त्यावर पडलेला असतो.
नवीन पाणीपुरवठा योजने करिता पाईपलाईनसाठी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, त्या रस्त्यांवर रात्री बे रात्री वयोवृद्ध नागरिक पडतात मोटरसायकल देखील या खड्ड्यांमुळे चालविणे मुश्किल झाले आहे. लहान मोठे अपघात या खड्यामुळे होतात.
या सर्व समस्या आपण त्वरित सोडाव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख विकास पाटील, तालुका संघटक सुरेश चौधरी, युवा सेनेचे राहुल वंजारी, सुनील देवघटोले, सागर वंजारी यांची उपस्थिती होती.

-पालकमंत्र्यांच्या फोन जिल्हाधिकाऱ्यांना जाताच नवीन अधिकारी जनार्दन पवार हजर

वरणगाव समस्या संदर्भात शिवसेने च्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे भेट घेऊन वरणगावातील समस्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी तत्काळ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून वरणगावच्या समस्या तात्काळ मार्गी लावा आणि नवीन अधिकारी किंवा मुख्याधिकारी पाठवा अशा सूचना दिल्या. त्यानंतर वरणगाव येथे जनार्दन पवार हे अधिकारी नियुक्त झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.