राज्यात पुढील दोन दिवसात गारपीटीसह पाऊस – बळीराजाची चिंता वाढली :

मुंबई : राज्याच्या हवामान विभाागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी दोन दिवसत राज्यात पावसाची शक्यता असून काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आज मध्यम पावसाच्या सरी बरसतील शिवाय तुरळक पावसाची हजेरी होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. अवकाळी पावसासोबत तापमानाचा पारा घसरला असून थंडीत मोठी वाढ झाली आहे.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे.
अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रालगत चक्रावार वार्‍यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातील बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काही दिवसात वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.