भुसावळ (प्रतिनिधी )-
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघा उपद्रवींना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी नुकतेच काढले आहेत. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या कार्यकाळात याबाबतचे प्रस्ताव प्रांतांकडे सादर करण्यात आले होते तर नुकताच पदभार घेतलेल्या पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारांचा डाटा संकलीत करीत गुन्हेगार हद्दपारीची प्रक्रिया नव्याने राबवण्यास सुरुवात केली आहे. हद्दपार झालेल्यांमध्ये शाकीर गोलू शेख रशीद (रा.विवेकानंद शाळेमागे, 32 खोली, भुसावळ) व विनोद लक्ष्मण चावरीया (रा.72 खोली, वाल्मिक नगर, भुसावळ) यांचा समावेश असून शाकीर रशीद यास नोटीस बजावण्यात आली आहे.
भुसावळातील गुन्हेगारी राज्यभरात चर्चेत असून यापूर्वी घडलेल्या अप्रिय घटनांचा आलेख पाहता शहरात शांतता नांदण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पुढाकार घेतला आहे. गुन्हेगारांचा डाटाच त्यांनी तयार करीत त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास सुरुवात केली आहे शिवाय शरीराविरुद्ध तसेच मालमत्तांविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या संशयीतांना हद्दपार करण्यासाठी प्रांताधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील दोन प्रस्तावांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दोन उपद्रवींना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकार्यांनी आदेश काढले आहेत.




