परदेशवारीची माहिती लपविणार्‍या अमळनेरच्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल ; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची कारवाई; जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल

जळगाव – परदेशातून आल्याची माहिती लपवून प्रशासनाची दिशाभूल करणार्‍या अमळनेर येथील दाम्पत्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत जिल्हा प्रशासनानेही कठोर पावले उचलली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. दरम्यान दाम्पत्याला घरात विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच 14 दिवसांपर्यंत घराच्या बाहेर पडू नये अशी तंबी देण्यात आली असून त्याच्यावर पोलीस यंत्रणेची नजर राहणार आहे.
प्रांतधिकार्‍यांना मिळाली गोपनीय माहिती
अमळनेर शहरातील दाम्पत्य परदेशात गेले होते. 15 मार्च रोजी दाम्पत्य परदेशातून अमळनेर शहरात परतले. यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केली नाही. तसेच प्रशासनाला माहितीही कळविली नाही. अमळनेर येथील प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनया परदेशातून परलेल्या दाम्पत्याबाबत अनोळखी इसमाने फोनवरुन माहिती दिली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार या प्रकरणाची प्रांतधिकारी यांनी गंभीर दखल घेतली व तत्काळ दाम्पत्याची तपासणीसाठी करण्यासाठी वैद्यकीय पथक चौकशीसाठी करण्यासाठी पाठविण्यात आले.
थायलंड, बॅकांकहून परतले दाम्पत्य
कर्मचार्‍यांना दाम्पत्याने परेदशात न जाता पुणे येथे मुलाच्या भेटीला गेल्याची माहिती दिली. प्रांतधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी व पोलिसांची मदत घेवून दाम्पत्य देत असलेल्या माहिती सत्यता पडताळून पाहिली. यात अमळनेर येथील पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलीस नाईक शरद पाटील यांनी गोपनीय माहिती काढली. तसेच दाम्पत्यांचे घरी जावून पासपोर्टची तपासले व विश्‍वासात घेवून माहिती घेतली असता, यात कुटूंब हे थायलंड, बँकाक येथून परतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शासकीय यंत्रणेपासून खरी माहिती लपवून ठेवून दिशाभूल केल्याने दाम्पत्याविरोधात साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम 2 अ व 3 भादवि कलम 188 प्रमाणे अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 दिवसांपर्यंत घरात; बाहेर न पडण्याची दिली तंबी-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच त्यांची तपासणी करुन नुमने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 14 दिवसांपर्यंत घराच्या बाहेर पडू नये अशी तंबीही दाम्पत्याला देण्यात असून दोघांवर पोलीस यंत्रणेचे लक्ष आहे. या 14 दिवसांच्या काळात घरातून दाम्पत्य बाहेर पडले त्याच्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या सर्व प्रभारींना कार्यवाहीबाबत सुचना
सार्वजनिक आरोग्य विभाग , मंत्रालय मुंबई यायांचे कडील दिनांक – 14 मार्च 2020 अन्वये करोना विषाणू ( कोव्हीड 19 ) चा प्रादुर्भाव प्रार्दभाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली होती. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी जळगाव जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात करोना विषाणू ( कोव्हीड 19 ) वर नियत्रंण आणण्याकरीता व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचना दिल्या होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *