भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी मुळे सर्व व्यवसाय जवळपास ठप्प झाले आहेत. त्यातच राष्ट्रीय महामार्गाचे कामही ठप्प झाले असून या मजुरांच्या हातांना काम नसल्याने पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अश्या परिस्थितीत सुमारे 57 मजूर आपल्या कुटुंबासह गुरुवारी सकाळी साकेगावजवळून मध्यप्रदेशात जाण्यासाठी पायीच निघाले होते . तेव्हा एक आयशर या भागातून जात असल्याने मजुरांनी वाहन चालकास वाहनात बसण्याची परवानगी मागितली मात्र वाहन चालकाने आपण केवळ सावद्यापर्यंत जात असल्याचे सांगितल्याने मजुरांनी तेथपर्यंत सोडण्याची विनंती केल्यानंतर सर्व मजूरांना घेवून आयशर (एम.एच.25 यु.0335) सावद्याच्या दिशेने निघाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना हे वाहन दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.
दरम्यान ताब्यात घेतलेल्या वाहनातील सर्व मजुरांना प्रांताधिकारी कार्यालयात आणल्यानंतर त्यांच्या नावाची नोंदणी करून घेण्यात आली. तसेच या मजुरांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था शहरातील नगरसेवक युवराज लोणारी यांच्या लोणारी समाज मंगल कार्यालयात व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व उपनिरीक्षक वैभव पेटकर यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घटनास्थळी धाव घेतली.



