भुसवाळ (प्रतिनिधी )-
कोरोना व्हायरसने देशभरातच नव्हे तर जगभरात दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीत रेल्वे स्टेशन, एसटी मंडळ अधिकरी , खाजगी ट्रॅव्हल्सचे संचालक यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे . यासाठी रेल्वे स्टेशन व बसस्टॅन्ड येथे येणाऱ्या -जाणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे .
राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी कोरोनाशी सामना करण्यासाठी खबरदारी म्हणून सतर्कतेचे आदेश दिले आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन ते बसस्टॅन्ड येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश जारी करतांना आरोग्य पथक नेमण्याचे सांगितलेले आहे. मात्र, भुसावळात रेल्वे, एसटीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही.
भुसावळ शहर ऐतिहासिक व मोठे रेल्वे जंक्शन असल्याने दररोज लाखो प्रवासी बस, रेल्वेने ये- जा करतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे स्थानक, बसस्थानकांवर पथक नेमून प्रवाशांची तपासणी करा, असे आदेश दिले आहेत. मात्र, रेल्वे व बस स्थानकावर अजूनही पथक नेमण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रात संशयित रुग्णांची वाढती संख्या पाहता, शासनाने कालच राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागांना अलर्टवर ठेवले आहे, असे असताना रेल्वे व एसटीचे अधिकारी गाफील कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. दोन्ही स्थानकांवर फेरफटका मारला असता, प्रवासी बिनधास्तपणे ये-जा करत असल्याचे आढळले. या ठिकाणी आरोग्य पथक दिसून आले नाही. एकूणच दोन्ही स्थानकांवर प्रवाशींचे आरोग्य रामभरोसे असल्याचे दिसते. तसेच शासनाकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे. शासन दरबारी दररोज बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातुन प्रवाशी भुसावळात येतात, त्यामुळे कोरोना व्हायरस आपल्याकडे येण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे-संभाजीनगर परिसरात कोरोना जास्त आढळला आहे त्यातच भुसावळात खाजगी ट्रॅव्हल्स मधून दररोज सुमारे ५०० प्रवाशी येतात, त्याची तपासणी होणे गरजेचे आहे, याबाबतीत आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे.
भुसावळ परिसरात रेल्वे झोनल ट्रेनिंग सेंटरच्या अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे, त्यांनी परराज्यातील प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थीना सुट्टी जाहीर करावी अशीही मागणी शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केली आहे.



