रेल्वे प्रवास आता अधिक जलद : भुसावळ विभागातील 12 गाड्यांना आता ताशी 130 चा वेग –

भुसावळ : भुसावळ विभागात करण्यात आलेल्या इन्फ्रा कामांमुळे शुक्रवार. 10 नोव्हेंबरपासून इगतपुरी-नाशिक-भुसावळ-अकोला-बडनेरा सेक्शनवर 526. 65 किमी अंतर प्रतितास 130 किमीच्या वेगाने 12 रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. भुसावळ विभागात रेल्वेचा तासी 120 चा वेग होता व ईगतपुरी ते बडनेरा या मार्गावर 120 च्या वेगात गाड्या धावत होत्या मात्र रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या इन्फ्राच्या कामांमुळे आता गाड्यांचा वेग वाढला आहे. प्राथमिक तत्वावर आता या गाड्या तासी 130 च्या वेगात धावत आहेत. रेल्वेगाड्या नियोजीत वेळेपेक्षा दहा मिनिटे अगोदरच रेल्वे स्थानकांवर पोहोचत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळही वाचत आहे.

अनेक वर्षानंतर वाढली वेगमर्यादा
गेल्या अनेक वर्षांपासून विभागात 110 ते 120 च्या वेगात रेल्वे गाड्या धावत होत्या मात्र आता या गाड्या ताशी 130 च्या वेगात धावत आहेत. भुसावळ विभागात गेल्या वर्षभरात करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा हा परीणाम समोर आला आहे.

या गाड्यांचा वेग
मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-नागपूर एक्स्प्रेस, सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, गोंदिया-सीएसएमटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-गोंदिया एक्स्प्रेस, सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, सीएसएमटी -हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (इगतपुरी-भुसावळ),हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस (भुसावळ- इगतपुरी) या गाड्यांचा वेग वाढविण्यात आला आहे.

मध्य रेल्वेत असे आहेत विभाग

मध्य रेल्वेत एक हजार 111.33 किमी अंतर 130 किमी प्रतितास वेगाने धावत आहे. यात इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभाग- 526. 65 किमी, पुणे-दौंड विभाग- 75.59 किमी, इटारसी-नागपूर-वर्धा-बल्लारशाह विभाग- 509.09 किमी, दौंड-सोलापूर-वाडी विभाग- 337.44 किमी वर काम चालू आहे.