भुसावळ : गिरणासह तापी नदीतील वाळू विक्रीला शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी शहर व तालुक्यातील बांधकाम मंजुरांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या सहा महिन्यांपासून वाळू बंद असल्याने शहरासह तालुक्यात बांधकामे ठप्प झाल्याने मजुरांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या गवंडी, बिगारी, प्लंबर, वीट व्यावसायीक व मजूर, पेंटर, इलेक्ट्रीशयन, वेल्डर, सुतार आदी घटकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे.

प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
गिणा व अन्य वाळूचा व्यवसाय सुरू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परीषदेने मजूर व कामगारांसह सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. वाढीव दराने देखील रेती (वाळू) मिळत नाही. हीच रेती पूर्वी सारखी शासकीय परवानगीने विक्री केली तर शासनाचे काहीही नुकसान होणार नाही. या व्यवसायावर वीट कामगार, वीट वाहतूक करणारे वाहन व मजूर तसेच सिमेंट दुकानदार, रंगकाम करणारे कामगार, नळ कामगार, इले. फिटिंग करणारे व्यवसाय आदी अवलंबून असल्याने वाळू मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद आहे. यावेळी शहरासह तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगार व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


