भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतात पहिल्या क्रमांकांचे लोको पायलट ट्रेनिंग सेंटर म्हणून नावलौकिक असलेल्या मध्य रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. गेल्या चार दिवसांपासून पिण्याचे व वापरण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी अन्नपूर्णा भोजनालयासमोर निदर्शने केली. तसेच भोजनालयातील जेवणही नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यातआला. प्रशिक्षणार्थ्यांचा आरोप आहे की, सेंटरमधील भोजनालयातून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून पिण्याचे पाणीही मिळत नाही.वसतिगृहात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंघोळीपासून दैनंदिन वापरासाठी पाणी न मिळाल्याने मोठी कुचंबणा होत आहे. पाण्याची व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याने हा उद्रेक झाल्याचे परिसरात बोलले जात आहे.काही महिन्यांपूर्वी याच सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर जेवण बनविणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करून गेल्या महिन्याभरापूर्वी नवीन कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.प्राचार्यांसह अधिकाऱ्यांची धावघटनेची माहिती मिळताच झोनल ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य डॉ. रामनिवास मीना यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे सीनियर डीईएन विजय भास्कर राव, झोनल ट्रेनिंग सेंटरचे एडीईएन व्ही. के. मिश्रा, मध्य रेल्वेचे एडीईएन राजेंद्र देशपांडे यांनी परिस्थितीची पाहणी केली.जलवाहिनीमध्ये बिघाडप्राचार्य डॉ. रामनिवास मीना म्हणाले, “पाणीपुरवठा यंत्रणेतील पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने पुरवठा विस्कळीत झाला होता. कमी दाबाने पाणी येत असल्याने ४ दिवसांपासून अडचणी आहेत. मात्र, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.तांत्रिक बिघाड झाल्याने सेंटरमध्ये पाण्याचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी व भोजनालय या दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. प्रशिक्षणार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून बाहेरून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. भोजनालयातील आरओ प्लांटची दुरुस्तीही अंतिम टप्प्यात असून शुक्रवारपर्यंत तो कार्यान्वित होईल

.प्रत्येक प्रशिक्षणार्थीची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. जेवणाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करीत नाही. प्रत्येक बॅच तपासूनच दिली जाते. पाण्याचा प्रश्न २ दिवसांत पूर्णपणे मार्गी लागेल. डॉ. रामनिवास मीना, प्राचार्य, झोनल ट्रेनिंग सेंटर, मध्य रेल्वे, भुसावळ
आमच्या कंत्राटात जेवण बनवणे व पुरवणे एवढीच जबाबदारी आहे. पाणीपुरवठा करणे हा आमच्या कराराचा भाग नाही. सेंटरकडूनच आम्हाला पाणी उपलब्ध करून दिले जाते. गेल्या ४ दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने आम्हाला नाईलाजाने बाहेरून टँकरने जादा दराने पाणी विकत घेऊन जेवण बनवावे लागत आहे. प्रत्येक वेळी कच्चा माल व शिजवलेले अन्न रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासले जाते. त्यांच्या मंजुरीशिवाय एकही ताट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही.अनुपमा शेगावकर, सुपरवायझर, अन्नपूर्णा भोजनालय कंत्राटदार कंपनी


