जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ कंपनीकडून सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून दररोज सुरू केली जाणार असून जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसह व्यापार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्यासोबतच दोन महिन्यांपासून बंद असलेली अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू झाल्याने सोयीचे झाले आहे. ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे.
विमान रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ‘अलायन्स एअर’च्या मुंबई आणि अहमदाबाद विमानफेर्या रद्द करण्याचे प्रमाण अधिक होते. आता दररोज सेवा सुरू झाल्याने केवळ दीड तासात मुंबई गाठता येत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
